राजकारण

कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र; ज्यांचा गौरव आपण देश की बेटियॉं...

कुस्तीपटूंनी कठोर भूमिका घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहीले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनावर मोर्चा काढला होता. यावर कारवाई करत पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले होते. तर, पोलिसांनी जंतरमंतरवरून कुस्तीपटूंचा तंबूही हटवला होता. यानंतर कुस्तीपटूंनी कठोर भूमिका घेत पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र लिहीले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियॉं' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही 'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहदयता होती आणि हीच सहदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुःखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान