मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशात दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच. मात्र गरीब मराठा समजातील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे. ही बाब ध्यानात ठेवावी, असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी शिंदे सरकारला ठणकावले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
संभाजीराजे म्हणाले की, मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सोमवारी मुंबईत मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी आहे. मात्र या मोर्चात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर चांगली बाब आहे. दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच. मात्र गरीब मराठा समजतील मुलांना देखील आरक्षण मिळायला पाहिजे. ही बाब ध्यानात ठेवावी, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे मुख्यमंत्री होते. आता ते सर्व समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत. ते विशिष्ट समाजाचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही. त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलीय. तो त्यांचा अधिकार आहे, असेही संभाराजेंनी सांगितले. दरम्यान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी देऊन खासदार करावे, अशी मागणी केली होती.