नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर नववर्षात आज पहिलीच सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तर, आजच शिवसेना चिन्हाप्रकरणी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यामुळे आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकारचा मृत्यू अटळ आहे. शिंदे सरकार फेब्रुवारी पाहणार नाही, असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही सर्व प्रकारे लढायला तयार आहोत. मागील सहा महिन्यापासून राज्यात घटनाबाह्य सरकार सत्तेत आहे. हे सरकार भष्टाचार करत आहे. महाराष्ट्रातील या प्रकरणावरुन देशात आणि जगात काय मेसेज जाणार आहेत. भविष्यात आपण कोणते आदर्श निर्माण करणार आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी सांगितले आहे, या देशात लोकशाही न्याय व्यवस्था आहे की नाही महाराष्ट्राबाबत जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल. आमची बाजू सत्याची आहे, आम्हाला सत्याच्या पलीकडे काहीही नको आहे. आमच्याच बाजूने निकाल लागेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे-फडणवीस सरकारमधील एक अतिशहाणे मंत्री म्हणाले, मार्च पर्यंत सरकार पाडून दाखवा. त्यांनी कानामधील बोळे काढून जरा नीट ऐका कान साफ करून माझं बोलणं ऐका नाहीतर कानकोरणे पाठवतो, जर न्यायालयीन प्रक्रिया झाली तर सरकार पडेल असे मी म्हणालो, असे म्हणत संजय राऊतांनी सुधीर मुंगनटीवार यांना टोला लगावला आहे.
सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यात आले, पैशाचा वारेमाप वापर झाला, पक्षात फुट पाडली आणि खोकेबाज सरकार आले. राज्य सरकारचा मृत्यू अटळ आहे. शिंदे सरकार फेब्रुवारी पाहणार नाही. निवडणूक आयोगात आज सुनावणी आहे, ज्यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना न्याय मिळेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.