(Mahavistar AI App) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ‘महाविस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप सादर करण्यात आले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंदर्भात अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही "Whole of Government" दृष्टिकोन स्वीकारून, सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले की, कृषी विभागाने पाणी आणि खतांचा योग्य वापर, पीक पद्धती यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. 10,000 गावांमध्ये सुरू असलेल्या ॲग्री बिझनेस उपक्रमांची माहिती देताना त्यांनी प्रत्येक तालुक्यात डिजिटल शेतीशाळा सुरू करण्यावर भर दिला. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज लक्षात घेता, पावसाचा लाभ कसा उठवायचा यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांना योग्यवेळी बियाणे आणि खते मिळतील यासाठी नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले. अनावश्यक बियाणे किंवा खते खरेदीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सावकारांच्या कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी यासाठी बँकांनी पतपुरवठा उद्दिष्ट पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेती क्षेत्राचा देशाच्या GDP मध्ये 11% वाटा असूनही, 45% लोकसंख्या यावर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी अधिक धोरणात्मक गुंतवणूक आणि योजनांची अंमलबजावणी गरजेची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी वाढविण्यावर भर द्यावा, याचेही त्यांनी आवाहन केले.
या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ‘महाविस्तार’ ॲप, महा डीबीटी योजना व दिशादर्शिका पुस्तिकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.