( Sanjay Raut Book Narkatla Swarg ) संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत. आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'नरकातला स्वर्ग' (Narkatla Swarg) या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे.
या पुस्तकातून मोदी आणि अमित शाह यांना शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची माहिती संजय राऊत यांनी सांगितली आहे. यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केलेल्या मदतीची देखील माहिती दिली आहे. बाळासाहेबांनी अमित शाहांवर उपकार केल्याचा पुस्तकात दावा करण्यात आला आहे.
गुजरात दंगल प्रकरणात शाह संकटात असताना बाळासाहेबांनी त्यांना कसं वाचवलं? अमित शाहांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी कुणाला फोन केला? पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं. गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरु होता. याचदरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शाहांना तुरुंगात टाकलं होतं
कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता, अटकेची टांगती तलवार होती. मात्र लोकशाहीने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकारांचं स्मरण पुढे किती ठेवलं? असा सवाल या पुस्तकातून विचारण्यात आला आहे.
अमित शाह एका हत्या प्रकरणात आरोपी होते. त्यांना तडीपारही केलं होतं, शाहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता, पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. पवारांनी त्यांना मदत केली, शाहांना एका प्रकरणात जामीन मिळाला. अमित शाह गुजरातच्या दंगली नंतर प्रचंड अडचणीत होते. दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
तेव्हा अमित शाहांना कोणीतरी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सुचवले होते. त्यानंतर भर दुपारी शाह लहान जय शाह यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले ते बांद्राच्या दिशेने निघाले. मात्र कलानगरच्या मुख्य गेटवरच अमित शाह यांना अडवून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली आणि अमित शाह हे मातोश्रीवर आले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शाहांना कसं वाचवलं हे या पुस्तकातून सांगण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या उपकारांची किती जाण ठेवली?, असा या पुस्तकातून राऊतांनी सवाल केला आहे.