पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंढरपूर वारीदरम्यान जखमी झालेल्या किंवा एखाद्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे. विठ्ठलाच्या भक्तांसाठी "विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025" जाहीर केली आहे.यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना यंदाच्या आषाढी एकादशीला जणू विठ्ठलच पावला आहे.
800 वर्षांपासून अविरतपणे चालू असलेल्या पंढरपूरच्या वारीला यंदा विठुरायाचा आशीर्वाद मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना लागू केली आहे. "विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025 असे या योजनेचे नाव असून या योजनेअंतर्गत वारीच्या कालावधीत (16 जून ते 10 जुलै, 2025) जर एखादया वारकऱ्याला काही दुखापत झाली किंवा एखादा वारकरी जर मृत्युमुखी पडला तर त्याला सरकारकडून 4 लाखाची मदत केली जाणार आहे. वारकऱ्यांसंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या वारीदरम्यान जर एखाद्याला 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखांची मदत आणि 60 टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व आल्यास 74 हजारांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त वारकऱ्यांसाठी योग्य सोई सुविधा पुरवल्या जाव्यात आणि त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात याव्या यासाठी "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्यात आले आहे. याचे मुख्यालय खुद्द पंढरपूरमध्ये असून अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा संरक्षण, पालखी मार्गांवर भूसंपादन यासारख्या योजना याद्वारे राबवल्या जाणार आहेत.
यंदा सरकारतर्फे 1909 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान मिळणार असून सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण 2.21 कोटी दिले जाणार आहेत. मुखमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली "चरणसेवा" उपक्रम", "आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी" अभियानांतर्गत वैद्यकीय शिबिरे, "माझी वारी, माझा संकल्प" अभियान अश्या विविध संकल्पना राबवल्या जाणार आहेत. पंढरपूर शहरात स्नानगृह, स्वच्छतागृह त्याबरोबर मोठे मोठे वॉटरप्रूफ मंडपही आषाढी एकादशीच्या निमिताने उभारण्यात आले आहेत.