थोडक्यात
कोकणात रो-रोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार
ऑक्टोबरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता
जहाजाची क्षमता 656 प्रवासी, 50 चारचाकी आणि 30 दुचाकी इतकी असेल
(Mumbai Konkan Ro-Ro Ferry) मुंबईकरांना कोकणात जलद प्रवासाचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. मुंबईतील भाऊचा धक्का येथून रत्नागिरीतील जयगड आणि पुढे सिंधुदुर्गातील विजयदुर्गपर्यंत रो-रो सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, ऑक्टोबर महिन्यात तिचा शुभारंभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 147 परवानगी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या सेवेद्वारे प्रवासी व वाहने दोन्ही वाहून नेली जातील. जहाजाची क्षमता 656 प्रवासी, 50 चारचाकी आणि 30 दुचाकी इतकी असेल. दक्षिण आशियातील सर्वात वेगवान अशी ही सेवा मानली जात असून, तिचा वेग 25 नॉट्सपर्यंत असेल. त्यामुळे मुंबईहून रत्नागिरीला केवळ 3 ते 3.5 तासांत आणि सिंधुदुर्गला 5 ते 5.5 तासांत पोहोचता येणार आहे.
सध्या ही सेवा दिवसाच्या वेळेत सुरू होईल, तर भविष्यात श्रीवर्धन आणि माणगाव येथेही थांबे देण्याची योजना आहे. प्रवासादरम्यान मुंबईतील भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ), जयगड (रत्नागिरी) आणि विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) या ठिकाणी जेटी सुविधा उपलब्ध असतील. विजयदुर्गहून पुढे 40 किलोमीटर अंतरावर प्रवाशांसाठी बससेवाही उपलब्ध करून दिली जाईल.
प्रवाशांसाठी वेगवेगळ्या श्रेणींची भाडे संरचना निश्चित करण्यात आली आहे. फर्स्ट क्लासचे भाडे ₹9,000, बिझनेस क्लाससाठी ₹7,500, प्रीमियम इकॉनॉमीसाठी ₹4,000 तर साध्या इकॉनॉमीसाठी ₹2,500 आकारले जाणार आहेत.