उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीत शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं हा एक दिवसीय बंद पुकारला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या महाविकास आघाडीनं आज (11 ऑक्टोबर) 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आहे. काही ठिकाणी रस्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी लखीमपूर खिरी घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत शिवसैनिकांकडून रस्तारोको
लखीमपूर खिरी इथल्या घटनेच्या निषेधार्थ बंद मध्ये मुंबईत शिवसैनिकांनी रास्ता रोको करण्यात आला. शिवसेनेच्या नेत्यांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. आपात्कालीन वाहतूक अडवली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला आहे.
बेस्ट बसेचची तोडफोड
काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान मुंबईत बेस्ट च्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण मागवले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
बंद किती दिवस आहे?
लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने एक दिवसीय बंद पुकारला आहे. लखीमपूर घटनेची तीव्रता केंद्र सरकारला कळावी तसेच शेतकऱ्यांना पाठिंबा मिळावा यासाठी हा बंद पुकारण्यात आल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या प्रवक्यांनी सांगितलं आहे.