कल्याण: कागदपत्रांची वैधता संपली तरी गाड्या वापरत असल्याने आरटीओने केडीएमसीच्या कचरा उचलणाऱ्या १५ गाडयांच्या विरोधात कल्याण आरटीओने कारवाई केली आहे. या कारवाईत गाडी मालकांना एकूण सव्वा लाखाचा दंड ठोठावला असून केडीएमसीला नोटिस देखील बजावली आहे.
केडीएमसीच्या काँट्रॅक्टवरील कचऱ्याचे डंपर, ट्रक मुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आरटीओकडून पालिकेच्या विविध विभागात काँट्रॅक्टवर असलेले ट्रक, डंपरसह चालकांची तपासणी सुरू केली आहे. यात दिवसभरात १५ ट्रक व डंपरवर कारवाई करण्यात आली असून सव्वा लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. शिवाय केडीएमसीला नोटीस बजावण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम, घनकचरा यासारख्या विभागात अनेकदा ठेकेदारी पद्धतीने वाहने भाडेतत्वावर घेतली जातात. ही वाहने अनेकदा सुस्थितीत नसल्याने अपघात घडत असतात. तर या वाहनांच्या कागद पत्राकडे देखील दुर्लक्ष करण्यात येते, चालकाचे लायसन्स देखील तपासले जात नाही. गेल्या आठवडाभरात अशाच ट्रकच्या अपघातात महिलेसह तिच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी सात ते आठ गाड्यांचे नुकसान झाले होते.