आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस होता. या अधिवेशनात अनेक वादंग निर्माण करणाऱ्या गोष्टी घडल्या. पावसाळी अधिवेशनाचे पाचही दिवस वादळी ठरले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काल अभूतपूर्व असा गोंधळ घडला. 17 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला आहे. यानंतर लगेचच आता पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशन प्रथा-परंपरेप्रमाणे नागपूरला होत आहे. महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन सलग दोन वर्षे मुंबईत घेण्यात आले. राज्य विधिमंडळाचे वर्षातून तीन अधिवेशन घेतले जातात. या तीन अधिवेशनापैकी दोन अधिवेशनाचे कामकाज मुंबईतील विधानसभा सभागृहातून चालते. त्यासाठी, राज्यातील सर्वच आमदार मुंबईला येतात. तर, हिवाळी अधिवेशन दरवर्षी उपराजधानी नागपूरला घेतले जाते.
पावसाळी अधिवेशन गाजले
17 ऑगस्ट पासून चालू झालेल्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. या अधिवेशनाचे पाचही दिवस गोंधळाचे ठरले. पायऱ्यांवर विरोधाकांसोबत सत्ताधारी सुद्धा आंदोलन करतांना दिसून आले. आमदारांमधील एकमेकांसोबत झटापटी संपूर्ण राज्याने पहिले. अधिवेशना दरम्यान काही सामान्य नागरिकांकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाले. ७५ हजार पदांची भरती ,आरे'मध्येच मेट्रो कारशेड,पोलिसांना पंधरा लाखांत घर असे अनेक महत्वाचे निर्णय पावसाळी अधिवेशनात सरकारकडून घेण्यात आले.