भूपेश बारंगे | वर्ध्यातील देवळी तालुक्यात अडेगाव येथे रेती वाहतूककरीत भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात दोन जण ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात अनिल सुरेश लाकडे वय 33 व ऋतिक दिनेश वानखेडे वय 24 रा. इंदिरानगर देवळी यांचा मृत्यू झाला.
अडेगाव शिवारात रेती आणण्याकरिता जात असलेल्या ट्रॅक्टरट्रॉलीचा हायड्रोलिक पट्टा तुटल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅक्टर झाडावर आदळला. यात ट्रॉलीमध्ये बसलेली मजूराच्या अंगावर ट्रॉली पलटी झाल्याने त्यात दबुन सुरेश लाकडे व ऋतिक दिनेश वानखेडे या दोघांचा मृत्यू झाला तर चालकासह इतर मजूर गंभीर जखमी झाले आहे.जखमीमध्ये ट्रॅक्टर चालक शंकर मनोहर भानारकर ,सागर विजय पारिसे,शिवराम डोंगरे, सचिन नांदूरकर,गजानन भानारकर असे जखमींचे नाव आहे जखमींना वर्धा येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
वाहनांवर कारवाईची गरज
देवळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती वाहतूक केली जात आहे. यात अनेक वाहनांकडे गौण खनिज परवाना राहत नाही. त्यामुळेच वाहने भरधाव वेगाने चालवत अपघाताच्या घटना वाढत आहेत.आज झालेल्या अपघात यातूनच झाल्याची नागरिकांत चर्चा आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
जिल्ह्यात हिंगणघाट, देवळी ,आर्वी,आष्टी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती वाहतूक केली जाते. याकडे महसूल विभाग पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून कारवाई केली जात नसल्याने रेती तस्करांचे मुजोरपनामुळे अनुचित घटनेत वाढ होत असून मजुरांचा नाहक बळी जात आहे.