( Nanded Heavy Rain) नांदेड जिल्ह्यात सुरू झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने जिल्हाभरात हाहाकार उडवला आहे. मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने मुखेड तालुक्यातील रावणगाव, हसनाळ, भासवाडी, वडगाव, भेंडेगाव यांसारख्या गावांना पाण्याचा वेढा बसला.
एका रात्रीत संसार उद्ध्वस्त झाल्याने ग्रामस्थांचे आक्रोश सुरू असतानाच, 24 तासांनी स्थानिक आमदार तुषार राठोड घटनास्थळी पोहोचले. या उशिरा झालेल्या पाहणीवरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत आमदारांना जाब विचारत घेराव घातला. अनेक ठिकाणी घरं, दुकानं, शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
नांदेडमध्ये पावसामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले. पुरस्थिती गंभीर होताच बोटींच्या साहाय्याने 100 हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली. सैन्य दलालाही पाचारण करण्यात आले होते. इतकी भीषण आपत्ती असताना स्थानिक आमदार 24 तास अनुपस्थित राहिल्याने गावकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला.