मुंबई : नववर्षाच्या स्वागताला पुण्यासह राज्यात हुडहुडी भरली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील बहुतांशी शहरांचे तापमान १५ अंशाखाली आले आहे. नाशिकचा पारा तर ९.८ अंशावर दाखल झाला असतानाच मुंबई १५, तर पुणे १२.२ अंशावर आहे. मुंबईत रविवारी नोंदविण्यात तापमान थंडीच्या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी आहे. येत्या दोन दिवसात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मध्य भारतातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान घसरले असून सकाळच्या थंडीने नागरिकांना हुडहुडी भरविली आहे. मुंबई आणि पुण्यासारखी शहरेदेखील गारठली असून राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १५ अंशाखाली आले आहे. मुंबईसह पुण्याचे दुपारचे कमाल तापमानही ३० अंशाखाली नोंदविण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली. उत्तर भारतात थंडीने कहर केला असून, येथील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदविण्यात आले आहे.
मुंबई : १५
माथेरान : १४
नाशिक : ९.८
जळगाव : १०.७
बारामती : १३.२
सातारा : १३.८
बुलढाणा : १४