(Khadakwasla Dam) पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये पाणीसाठा वाढू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ही वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
मागील वर्षी ही सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यांत तीव्र उन्हामुळे पाण्याची मागणी लक्षणीय वाढली होती. अशा परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे जूनच्या मध्यापर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार अशी शक्यता होती. मात्र यावर्षी 25 मेपासूनच पाण्याची आवक सुरू झाली असून 27मेपर्यंत एकूण साठा 5.74 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
26मे रोजी एका दिवसातच 28 एमएलडी इतक्या पाण्याची भर पडल्याने नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे. सोमवारी खडकवासला परिसरात 16 मिमी, पानशेतमध्ये 99 मिमी, वरसगावमध्ये 92 मिमी आणि टेमघरमध्ये 70मिमी पावसाची नोंद झाली.
ही चारही धरणे मिळून 29.50 टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता बाळगतात. याच धरणातून पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा आणि सिंचन योजनांना पाणी दिले जाते. दरवर्षी जून अखेरीसच पाणीसाठा वाढतो. मात्र यंदा मेमध्येच पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाणी कपात टळण्याची शक्यता आहे.