(Atal Setu) इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या खासगी व शासकीय इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना आजपासून टोलमाफी मिळणार आहे. सरकारने 21 ऑगस्टपासून ही सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत आहे.
एप्रिल महिन्यातच या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी पाच महिने लागले. आता अटल सेतूवर सुरुवात झाल्यानंतर, पुढील काही दिवसांत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि समृद्धी महामार्गावरही इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या "महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणा"तर्गत, प्रदूषण नियंत्रण आणि कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी टोल माफीचा निर्णय घेतला गेला होता. त्यामध्ये अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, तसेच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक चारचाकी व बसेसना पूर्ण टोल माफी देण्यात आली आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमध्ये 50 टक्के सवलत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.