राज्यात महायुती सत्तेत असली तरी ठाणे आणि नवी मुंबईत अंतर्गत कलह वाढताना दिसतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर येत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी ही चुरस अधिक तीव्र झाली आहे.
भाजपचे गणेश नाईक हे नवी मुंबईत दीर्घकाळ राजकीय बालेकिल्ला राखून आहेत. मात्र, आता त्या गडावर शिंदेंनी धडक मारली आहे. त्यांनी मराठा आंदोलनात आघाडीवर असलेले नेते अंकुश कदम यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात 27 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या घडामोडीनंतर नवी मुंबईतील राजकीय पाट्या बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अंकुश कदम हे तरुण व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईकांविरुद्ध स्वराज्य पक्षाकडून लढवली होती. निकाल त्यांच्या विरोधात लागला तरी त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला आणि मराठा आरक्षणासाठी आघाडीवर काम केले. त्यांचा प्रभाव विशेषतः तरुणांमध्ये लक्षणीय आहे. पक्क्या संघटनशक्तीमुळे ते शिंदेंना नवी मुंबईत आधार देतील, असा अंदाज आहे.
दुसरीकडे, ठाणे जिल्हा शिंदेंचा पारंपरिक गड मानला जातो. भाजपचा इथे प्रभाव कमी असूनही गणेश नाईक यांचा दीर्घकाळाचा अनुभव आणि कार्यकर्त्यांमधील पकड लक्षात घेता हा संघर्ष अधिक चुरशीचा होणार आहे. शिंदे आणि नाईक यांच्यातील वैचारिक आणि राजकीय संघर्ष आता सरळ सरळ महानगरपालिका निवडणुकीत दिसणार, अशी चिन्हे आहेत.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मुंबईत महायुती म्हणून लढाई होईल, परंतु ठाण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांविरुद्ध लढताना दिसतील.
यामुळे आगामी नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुका केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एवढ्यापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. तर, शिंदे गट आणि भाजपमध्येही थेट सामना होणार आहे. शिंदेंचा अंकुश कदमांसारखा लोकप्रिय तरुण नेता गळाला लागल्यामुळे गणेश नाईक यांचा प्रभाव कमी होतो का, आणि एकनाथ शिंदे गट त्यांना राजकारणात शह देतात का, हे पाहणं आता अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे.