पाकिस्तानला दिलेल्या खुलेआम पाठिंब्यामुळे तुर्की आणि अझरबैजानला भारतात मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पाकिस्तानला तुर्की आणि अझरबैजानने लष्करी व तांत्रिक पातळीवर मदत केली, असा आरोप समोर आला आहे.
यामुळे देशभरात तुर्की आणि अझरबैजानविरोधात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर #BoycottTurkey हा ट्रेंड वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील ट्रॅव्हल इंडस्ट्रीनेही निर्णायक भूमिका घेत तुर्की आणि अझरबैजानसाठीच्या बुकिंगमध्ये मोठी कपात केली आहे. MakeMyTrip या आघाडीच्या ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मनं माहिती दिली की, तुर्की व अझरबैजानच्या बुकिंगमध्ये 60% घट झाली. एका आठवड्यात 250% पर्यंत बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. EaseMyTrip ने ‘देश प्रथम, व्यवसाय नंतर’ हे धोरण स्वीकारत या देशांसाठी सर्व जाहिराती व ऑफर्स offers बंद केल्या आहेत.
EaseMyTripचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी स्पष्ट केलं की, “जे देश भारतविरोधी भूमिका घेतात, त्यांचं समर्थन करणे उचित नाही. प्रत्येक भारतीयाने आपल्या पैशांचा उपयोग अशा देशांमध्ये करावा जे आपल्या मूल्यांचा सन्मान करतात.” या बहिष्कारामुळे तुर्की व अझरबैजानच्या पर्यटन क्षेत्राला अंदाजे 3,000 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या देशभरात व्यापारी, नागरिक आणि ट्रॅव्हल कंपन्या या दोन्ही देशांविरोधात एकजुटीनं उभ्या आहेत.