मीरा रोडच्या नयानगर परिसरात रविवारी रात्री भीषण घटना घडली. नूरजहान नावाच्या ४० वर्षे जुन्या जीर्ण इमारतीतील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. तो थेट दुसऱ्या मजल्यावर कोसळल्याने खाली राहणारे कुटुंब दुर्दैवीरीत्या अडकले. या अपघातात एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जीर्ण इमारतींवर प्रश्नचिन्ह
सदर इमारत जुनी व धोकादायक अवस्थेत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. इतक्या वर्षांपासून जीर्ण झालेल्या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित करून वेळेत रिकामी का करण्यात आली नाही, असा संतप्त प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तत्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले असले तरी महापालिकेच्या निष्क्रीय कारभारावर बोट ठेवले जात आहे.
परिसरात हळहळ आणि संताप
या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निष्पाप बालकाचा जीव गमावल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे. "जर प्रशासनाने योग्य वेळी पावले उचलली असती, तर एका लहानग्याचा बळी गेला नसता," अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.