(Kerala Monsoon Update) उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने थंडावाचा दिलासा मिळाला. अवकाळी पावसाने लोकांना एवढा दिलासा मिळाला की, आता लोक पावसाळ्याची म्हणजे मान्सूनची वाट पाहत आहेत. देशभरात शेतकरी हे पावसावर अवलंबून असतात. यंदा हवामान विभागाने अनेकांसाठी दिलासादायक ठरणारा अंदाज लावला आहे.
यावेळी मे महिन्याच्या शेवटीच पावसाचे आगमन होणार आहे. यंदा केरळमध्ये पावसाचे ढग लवकर दाखल होणार आहेत. पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. ज्यामुळे शेती हंगाम वेळेवर सुरू होईल. तर सर्वसामान्य नागरिकांनाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. दरम्यान तब्बल 16 वर्षांनंतर इतक्या लवकर मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे. अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे.
भारतीय हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार 27 मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. मात्र यंदा देशभरात पाऊस सरासरी आणि सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्यामुळे, पुढच्या 24 तासांत केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे, यादरम्यान तिथे ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्याचसोबत दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पश्चिमेकडून काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज दर्शवला जात आहे.
केवळ केरळपुरतेच मर्यादित न राहता, मान्सून दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, लक्षद्वीप, मालदीव-कोमोरिन क्षेत्र, कर्नाटक, तमिळनाडू, बंगालच्या उपसागराचा दक्षिण व मध्य भाग आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्येही पोहोचण्याची शक्यता आहे. या लवकर येणाऱ्या मान्सूनमुळे शेतकरी, जल व्यवस्थापक आणि धोरणकर्त्यांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. सध्या सर्वांचे लक्ष केरळकडे लागले आहे, जिथे मान्सूनच्या सुरुवातीच्या सरी कधीही कोसळू शकतात.