पुण्यात पुन्हा एकदा हुंडाबळी आणि सासरच्या छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंजिनिअर असलेल्या दीप्ती चौधरी या विवाहितेने सासरच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. कुटुंबाकडून वारंवार मागण्या करण्यात आल्या आणि त्या पूर्ण करूनही दीप्तीला अपमान, टोमणे आणि छळ सहन करावा लागला.
या घटनेनंतर उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीप्तीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः गेल्या. कुटुंबीयांनी राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप केला.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, कोणत्याही महिलेला त्रास होत असेल तर तिने तात्काळ मदत मागावी. महिलांसाठी वन स्टॉप सेंटर, मोफत कायदेशीर मदत आणि समुपदेशन यांसारख्या सुरक्षित सुविधा उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी आपल्या लेकींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण त्रासाला वैतागून एका विवाहित महिलेने आपले जीवन संपवले. दीप्ती मगर-चौधरी असे या महिलेचे नाव असून ती पेशाने इंजिनिअर होती. काही वर्षांपूर्वी दीप्तीचे लग्न झाले होते. सुरुवातीचे दिवस ठीक गेले, मात्र त्यानंतर तिच्या आयुष्यात त्रास सुरू झाला. पतीसह सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार अपमानास्पद बोलणे, संशय आणि मारहाण सहन करावी लागत होती. घरकाम, दिसणं आणि वागणूक यावरून तिला कमी लेखले जात होते.
लग्नानंतर तिने दोन वेळा मातृत्वाचा अनुभव घेतला. पहिल्यांदा मुलगी झाल्याने सासरकडून नाराजी व्यक्त झाली. नंतर व्यवसायाच्या कारणावरून आणि गाडी घेण्यासाठी तिच्या माहेरून मोठी रक्कम मागण्यात आली, जी कुटुंबाने दिलीही. मात्र त्रास थांबला नाही. मानसिक दबाव, आर्थिक मागण्या आणि अमानुष वागणूक यामुळे दीप्ती पूर्णपणे खचली होती. अखेर २५ जानेवारी रोजी तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
थोडक्यात
पुण्यात पुन्हा एक धक्कादायक हुंडाबळी व सासरच्या छळाची घटना समोर आली.
इंजिनिअर असलेल्या विवाहित महिला, दीप्ती चौधरी, यांनी स्वतःचा जीवन संपवले.
दीप्तीला सतत सासरकडून मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागला.
कुटुंबाकडून वारंवार मागण्या करण्यात आल्या, त्या पूर्ण करूनही छळ आणि टोमणे सुरूच राहिले.
दीप्तीच्या या आत्महत्येमुळे सामाजिक स्तरावर संताप आणि चर्चेला सुरुवात झाली आहे.