अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेलच्या मैथिली पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही आपल्या मुलीने काहीतरी मोठं करून दाखवावं, हीच तिच्या आई-वडिलांची आशा होती. मात्र, अचानक घडलेल्या अपघाताने त्यांचे सर्वस्व हिरावले.
लोकशाही मराठीसोबत संवाद साधताना मैथिलीच्या आईने हृदयद्रावक शब्दांत आपल्या व्यथा मांडल्या. त्या म्हणाल्या, “मैथिली आमचं सगळं काही होती. आम्ही तिच्यावरच अवलंबून होतो. तिचे वडील मजूर आहेत. तिने शिक्षण पूर्ण केलं की आमची परिस्थिती सुधारेल, अशी आशा होती. पण तिचं पार्थिव आलं आणि सगळं संपलं...”
अपघातानंतर शासकीय यंत्रणांकडून मदतीचे आश्वासन दिले गेले असले, तरी कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, “मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगून पाहिलं, पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. अगदी आमच्या गावचे सरपंच सुद्धा आमच्याकडे फिरकले नाहीत.”
“सरकारने जर खरंच आमचं दुःख समजून घेतलं असतं, तर आज कुणीतरी तरी पाठीशी उभं राहिलं असतं,” असे सांगताना मैथिलीच्या आई चे अश्रू अनावर झाले.