मुंबईला नेहमी प्रदूषणासाठी दोष दिला जातो, पण ताज्या हवेच्या अहवालातून वेगळंच वास्तव समोर आलं आहे. शहराच्या मध्य भागापेक्षा उपनगरं आणि नवी मुंबईत हवा अधिक खराब असल्याचं दिसून आलं आहे. एकूण 27 परिसरांत हवेची स्थिती चिंताजनक ते धोकादायक पातळीवर पोहोचली आहे.
नवी मुंबईतील नेरूळ भागात सर्वाधिक प्रदूषण नोंदवलं गेलं. विमानतळ परिसर, महापे, बीकेसी, घाटकोपर, मालाड यांसारख्या भागांतही स्वच्छ हवा मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांचा श्वास अधिक अडचणीत सापडला आहे.
लोकसंख्या वाढ, सतत सुरू असलेली बांधकामं, मेट्रो व रस्त्यांची कामं, कारखाने आणि वाहनांची प्रचंड गर्दी ही हवेच्या बिघडलेल्या दर्जामागची मुख्य कारणं ठरत आहेत. कागदावर उपाय असले तरी प्रत्यक्षात त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.
हवा अशीच दूषित राहिली, तर दमा, श्वसनाचे आजार आणि हृदयविकार वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शहरासोबत उपनगरांकडेही तात्काळ लक्ष दिलं नाही, तर मुंबई महानगराचा श्वास आणखी घुसमटण्याची भीती आहे.
हवेतील गुणवत्ता निर्देशांक
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स- 170
घाटकोपर – 154
मालाड पश्चिम – 150
नेव्ही नगर कुलाबा – 149
भायखळा – 147
मझगाव – 138
कांदिवली पूर्व – 137
बांद्रा पूर्व – 135
सायन – 133
कुर्ला – 131