बारामतीत घडलेल्या एका भीषण विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या अपघातात विमानातील इतर पाच जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
बुधवारी सकाळी निवडणूक प्रचारासाठी मुंबईहून निघालेले विमान बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारच्या शेतात कोसळले. अपघात इतका गंभीर होता की स्फोट होऊन सर्वांचे जागीच प्राण गेले. अग्निशमन दलाने तात्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र काहीही उपयोग झाला नाही. गुरुवारी विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांसह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.
या घटनेनंतर भाजपने दिलेल्या श्रद्धांजली जाहिरातींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली.म्हटले.
संजय राऊत ट्विटमध्ये लिहितात की, "भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल" या विधानानंतर राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटले असून, भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.