लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवदर्शन घेतलं. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पडाव्या त्या करता गणरायाने आशीर्वाद द्यावे. साहजिकच जो उमेदवार असतो, पक्ष असतो. मला असं वाटतं या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राच्या मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावे. अशा प्रकारची प्रार्थना देवाला केली.
यासोबतच ते म्हणाले की, प्रत्येकाला काम करावंच लागते, प्रचार करावा लागतो. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. ज्या त्या पक्षाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तो विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतील, शेवटी जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे. ते जे निर्णय देतील तो सर्वांना शेवटी मान्य करायचा आहे. आम्ही ठरवलेलं आहे की, जास्तीत जास्त महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याकरता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जायचं. असे अजित पवार म्हणाले.