थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Ajit Pawar) नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून अनेक साधू-महंत येत असतात त्यांच्या निवासासाठी तपोवनामध्ये साधुग्राम नगरी वसविली जाते. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे.
यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वृक्षतोडी विरोधात नाशिककर, पर्यावरणप्रेमींसह सेलिब्रिटी देखील याला विरोध करताना पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार, राजकारणी यावर व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकरांच्या लढ्याला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, "तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात समोपचारानं तोडगा काढला पाहिजे. यासंदर्भात अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची आहे. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं ही देखील काळाची गरज आहे. पर्यावरण वाचलं तरच पुढची पिढी सुरक्षित राहीलं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे." असे अजित पवार म्हणाले.
Summery
कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे
त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार
तपोवनातील वृक्षतोडीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया