गेल्या तीन वर्षांपासून अजित पवार यांच्यावर सातत्याने ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्यांवर सतत घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले. दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबत आज सत्तेत बसलो,’ असे विधानही केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाणही आले होते. अशातच आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर भाष्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले की,”मी कोणत्याही फाईलमध्ये कोणताही बदल केला नाही. सचिवांनी दिलेल्या फाईसवर मी फक्त सही केली. त्यात जर मी काही बदल केला असता, तर त्याला सर्वस्वी मी जबाबदार असतो. पण मला टार्गेट केलं जात आहे. या आरोपांमुळे मी त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, एक श्वेतपत्रिका ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर काढण्यात आली. त्यावेळी माधवराव चितळे यांच्यासह ५ जणांची कमिटी होती. त्यांनी तीन महिने तपास केल्यानंतर या प्रकरणात कुठेही अनियमितता झाली, भ्रष्टाचार झाला नसल्याचा रिपोर्ट दिला. हे आजही रेकॉर्डवर आहे. असे अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राजकारणात आरोप होत असताता, असंही त्यांनी नमुद केलं.
पाठबंधारे खात्याचे नाव आता जलसंपदा मंत्रालय असे बदलण्यात आले आहे. यासंदर्भात माझ्यावर २०१० मध्येही आरोप झाले होते. त्यानंतर मी त्या काळात झालेल्या प्रकल्पांची आणि खात्याच्या हिशोबाची पडताळणी केली. १९६० पासून २०१० पर्यंतं या विभागाचा खर्च फक्त ४५ हजार कोटी इतका झाला होता. पण माझ्यावर आरोप मात्र ७० हजार कोटींचे करण्यात आले, हे कसे शक्य आहे, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. आज पुण्यात कोयता गॅंगवर बोलायला सगळे दबकत आहेत.
पण याला राजकीय पक्षच दोषी आहेत. निवडणुकीत यश मिळवायला सोपे जाते, असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलं आहे. त्यामुळे आताच नाही, गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मी एका पक्षाचा प्रतिनिधी आहे म्हणून एकट्याने सर्व निर्णय घेणे शक्य नाही. जिथे आठ-दहा पक्ष एकत्र काम करत आहेत, तिथे सर्वांनीच जबाबदारी घ्यावी लागते, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. “सर्व काही एका व्यक्तीवर किंवा एका पक्षावर ढकलून चालणार नाही. सामूहिक जबाबदारी स्वीकारली गेली पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी आता नियंत्रण आणणे आवश्यक आहे,” असेही अजित पवार यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.