मुंबईकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य मंत्रिमंडळाने अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष ५० टक्के सवलत देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे वाहनचालकांना अटल सेतूवरून प्रवास करताना केवळ २५० रुपये पथकर भरावा लागणार आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.यापूर्वी ४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल सेतूच्या वापरासाठी पन्नास टक्के पथकर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे दररोज अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला होता. वाढत्या प्रवासी संख्येला आणि नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने ही सवलत पुढेही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अटल सेतू हा मुंबई महानगरातील एक महत्त्वाचा दुवा असून, मुंबई शहर आणि नवी मुंबई यांना जोडणारा हा देशातील सर्वात लांब समुद्रावरील पूल आहे. या सेतूमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, दैनंदिन प्रवाशांसह व्यावसायिक वाहनांसाठीही हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे खासगी वाहनचालक, टॅक्सी, तसेच व्यावसायिक वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीत इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे पथकर दरही निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे पथकर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, पथकर सवलतीमुळे अटल सेतूवरील वाहतूक प्रवाह अधिक वाढेल आणि मुंबई–नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आणखी सुलभ होईल. तसेच इतर मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार आहे. अटल सेतूवरील पथकर सवलत वाढवण्याचा निर्णय हा नागरिकाभिमुख आणि प्रवासी हिताचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असून, आगामी काळात या सेतूचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.