संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकांबाबत बोलताना म्हटले की, मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचे आहेच. आम्ही स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजींनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. असे आमचे ठरते आहे. मुंबई असेल, ठाणे, पुणे, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावं.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत म्हणाले की, आमच्या सर्व शिवसैनिकांचेही तेच मत आहे आता. पक्ष म्हटला की, पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना संधीच मिळत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलेही मागचं एकमेकांवर कुरघोडी करणं किंवा टीका करणे याचा काही संबंध नाही.
शिवसेना आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कमपणे उभी आहे. ती एकाकी लढल्याशिवाय तिची ताकदही कळणार नाही आणि लोकांनाही ज्या संभ्रमात सर्वजण टाकत असतात त्याचा निश्चितपणे मार्ग निघेल. लोकसभा आणि विधानसभेत त्याची आवश्यकता होती. जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण कुठे संधी देऊ शकतो तर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपंचायती. असे अरविंद सावंत म्हणाले.