पुण्यामधील इंदापूर तालुक्यातील अकोले गावात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार भाषण करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. "मी दिलेला शब्द पाळतोच. कोणा व्यक्तीला खासदार करायचं ठरवलं, तर ते मी करून दाखवतो. कुणाचा काटा काढायचं ठरवलं, तर तोही काढतोच. ज्याला पाडायचा ठरवलं, तो मी खाली आणतोच," अशा ठाम शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.
तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख करत पवार म्हणाले, "हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. निवडणूकाजवळ असो किंवा नसो, मी नेहमीच 53 गावांमधील जनतेसाठी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे." छत्रपती साखर कारखान्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, "या कारखान्याला शरद पवार साहेब, तसेच घोलप आणि जाचक यांचं योग्य मार्गदर्शन लाभलं आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत छत्रपती कारखाना अधिक दर देतो, हे सत्य आहे."
विरोधकांवर हल्लाबोल करताना अजित पवार म्हणाले, "लोक सांगतात माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी ओळख आहे. पण खरं सांगायचं तर मला अमित शहा नावानेच ओळखलं जातं. पण तुम्हाला कुणी ओळखतं का?" असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी टोला लगावला. तसेच, "ज्यांनी स्वतःचे व्यवसाय नीट हाताळले नाहीत, त्यांना २२ हजार सभासदांच्या कारभाराची जबाबदारी पेलवेल का?" असा सवाल करत त्यांनी विरोधकांची चांगलीच खबर घेतली.