मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवस्मारकाच्या रखडलेल्या कामावरून थेट सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर (X) केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी २०१७ साली झालेल्या शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची आठवण करून देत राजकीय आश्वासनांवर सवाल उपस्थित केला आहे. २०१७ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात प्रस्तावित शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आठ वर्षे उलटूनही शिवस्मारकाचे प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
अविनाश जाधव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “२०१७ साली मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे अरबी समुद्रात भूमिपूजन झाले होते… हे लक्षात ठेवायचं आणि मतदान मागायला आले का विचारायचं.. अजून किती वेळ लागणार आमच्या राजाच्या स्मारकाला?”
आठ वर्षे उलटूनही शिवस्मारकाचे प्रत्यक्ष काम पूर्ण न झाल्याने जनतेच्या भावना दुखावल्या जात असून राजकीय आश्वासनांची विश्वासार्हता पुन्हा चर्चेत आली आहे. अविनाश जाधवांच्या या ट्विटनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवस्मारकाचा मुद्दा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत होत असलेला विलंब हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून मराठी जनतेच्या भावनांशी निगडित विषय असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अविनाश जाधव यांच्या या ट्विटनंतर शिवस्मारक प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची मागणी होत आहे.