देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील असा मोठा दावा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, देशात जी काही मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, ती शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील. ज्या पद्धतीने नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे एक दोन बिल पास करण्यासाठी भाजपसोबत थांबले आहेत ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून, यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे गट यांच्याकडे असणाऱ्या खासदारांची संख्या पाहाता संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य देखील हेच दाखवत आहे. आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच राऊत यांचा प्रयत्न आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून असलेली गरज सध्या भाजपसाठी संपलेली असून, भाजपची मोगलाई निती आहे. त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात हीच भाजपची निती आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
राज्यात आलेले सरकारच भ्रष्ट मार्गाने आल्याने येथील मंत्री उघडपणे भ्रष्टाचाराबाबत बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला आहे.