मुंबई – केंद्रीय भाजपाने यंदा २०२६ वर्ष प्रशिक्षण वर्ष म्हणून जाहीर केले असून, पक्षातील प्रत्येकाला प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. देशभर या महाअभियानासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत, तर महाराष्ट्रात ही सुरुवात २० फेब्रुवारीपासून होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी शिवप्रकाश हे महाअभियानाचे राष्ट्रीय संयोजक असतील. यामुळे महाराष्ट्रातील शिबिरे यशस्वी होत आहेत की नाही, यावर त्यांची विशेष नजर असेल. पश्चिम क्षेत्रासाठी गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दीव-दमण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रभारी म्हणून गुजरातमधील माजी खासदार के. सी. पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'पंच प्रण' आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेले पंच परिवर्तन याची माहिती शिबिरात प्रशिक्षणार्थींना प्रदर्शित केली जाईल.
या प्रशिक्षण महाअभियानाचा मुख्य गाभा म्हणजे – नेतागिरी करण्यापूर्वी कार्यकर्ता बनणे आणि भाजपचा विचार समजून घेणे. मूळ कार्यकर्ता, नवीन नेता किंवा बाहेरून आलेल्यांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. पुढील ५ ते २५ वर्षांसाठी वैचारिक फळी तयार करणे हा या महाअभियानाचा उद्देश आहे. प्रशिक्षणाची थीम – ‘व्यक्ती निर्माणातून संघटन निर्माण आणि संघटन निर्माणातून राष्ट्रनिर्माण’ अशी ठेवण्यात आली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येयधोरणे, वैचारिक बांधिलकी समजावून सांगितली जाईल. तसेच, कार्यकर्त्यांना प्रचार-प्रसाराच्या आधुनिक साधनांचे प्रशिक्षण दिले जाईल, जसे की PPT तयार करणे, सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी. मंडळापासून प्रदेशापर्यंत निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना आधी प्रशिक्षण दिले जाईल, नंतर सर्वांसाठी शिबिरे सुरू होतील. प्रशिक्षणासाठी शुल्क आकारले जाईल.
महाराष्ट्रातील महाअभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला मुंबईत एका बैठकीच्या निमित्ताने होईल. या दिवशी जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, १४ प्रदेश प्रशिक्षक आणि जिल्हा प्रशिक्षकांची बैठक घेतली जाईल. २४ फेब्रुवारीला केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय बैठक होईल. वर्षभर प्रदेश, जिल्हा आणि मंडळ पातळीवर निवासी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. फक्त शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथप्रमुखांचे प्रशिक्षण ऑनलाइन होईल.
प्रशिक्षणात पक्षाची वैचारिक बांधिलकी, कार्यपद्धती, कार्यकर्त्यांचे वर्तन, पक्षाचा इतिहास, समाजाप्रती संवेदनशीलता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना, फेक नरेटिव्हला कसे उत्तर द्यायचे, सरकारच्या योजनांशी जनसामान्यांना कसे जोडावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत माहिती दिली जाईल.
प्रशिक्षण शिबिर साध्या सुविधा असलेल्या ठिकाणी आयोजित केली जातील. भोजन साधे आणि निवास व्यवस्था अलिशान नसेल, अशी काळजी घेतली जाईल. या महाअभियानामुळे पक्षाचा वैचारिक पाया अधिक मजबूत होईल तसेच नवीन कार्यकर्त्यांना नेतृत्वासाठी योग्य दिशा मिळेल.