बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 'सितारे जमीन पर' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. या निमित्ताने नुकतेच त्यानी राज शमानी यांच्या पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. या संभाषणात आमिरने खुलासा केला की, त्याचा ड्रीम प्रोजेक्ट 'महाभारत' हा त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो. त्यामुळे आमिरने एकप्रकारे आपल्या शेवट्या चित्रपटाची घोषणाचं पॉडकास्टमध्ये केली आहे.
यावेळी आमिरला त्याच्या शेवटच्या चित्रपटाची थीम काय असेल, असे विचारले असता आमिर म्हणाला की, "महाभारत बनवणे हे माझे स्वप्न आहे आणि २० जून रोजी 'सीतारे जमीन पर' प्रदर्शित झाल्यानंतर मी त्यावर काम सुरू करेन. मला वाटते की हा एक असा प्रकल्प आहे जो एकदा मी पूर्ण केला की, त्यानंतर मी काहीही करू शकत नाही, अशी भावना निर्माण होईल. कारण त्याचे साहित्य असेच आहे. ते भावनिक, विशाल आणि भव्यतेने भरलेले आहे. जगात जे काही आहे, ते महाभारतात आढळू शकते." तो पुढे म्हणाला, "जर तुम्ही विचारत असाल, तर मी एकच विचार करू शकतो की, कदाचित महाभारत केल्यानंतर मला एक भावना वाटते की मला त्यापलीकडे काही करायचे नाही."
'सीतारे जमीन पर' हा आमिरच्या 'तारे जमीन पर' या हिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अभिनेत्री जिनेलिया डिसूझा आणि इतर दहा नवोदित कलाकार आहेत. यात आमिर बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित आणि आमिर खान आणि अपर्णा पुरोहित निर्मित, हा क्रीडा नाट्यमय चित्रपट २० जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.