Kanjurmang Dumping Ground : कांजूरमार्ग येथील कचरा टाकण्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या तीव्र वासामुळे आणि वाढलेल्या प्रदूषणामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. या परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने त्वरित उपाय करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले. स्वच्छ हवा मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे, मात्र सध्याच्या प्रदूषणामुळे श्वास घेणेही कठीण झाले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाच्या सूचनेनुसार एका विशेष पथकाने कांजूरमार्ग परिसराची पाहणी केली. त्यानंतर सरकारतर्फे माहिती सादर करण्यात आली. प्रदूषण कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि आयआयटी दिल्ली यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र न्यायालयाने या उत्तरावर नाराजी व्यक्त केली आणि महापालिका योग्य कारवाई करत नसल्याचे मत मांडले.
कांजूरमार्ग येथे दररोज सुमारे 6500 मेट्रिक टन कचरा जमा होतो. यातील केवळ 1000 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, तर उर्वरित कचरा तिथेच साठत जातो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामाचा आढावा घ्यावा, कचरा नीट झाकावा, ओला व सुका कचरा वेगळा करावा आणि दुर्गंधी पसरू नये यासाठी उपाय करावेत, अशा सूचना न्यायालयाने दिल्या. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत या बाबतीत कडक अंमलबजावणी होत नसल्याचेही न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 डिसेंबर रोजी होणार आहे.
मुंबईत एकूण चार लँडफिल असून गोराई येथील लँडफिल आधीच बंद आहे, तर मुलुंड येथील बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या शहरातील बहुतांश कचरा देवनार आणि कांजूरमार्ग येथे आणला जात आहे. देवनारची जागा धारावी प्रकल्पासाठी वापरली जाणार असल्याने ती बंद झाली, तर महापालिकेकडे पर्याय उपलब्ध नसल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.