थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मुंबईच्या जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या कल्याण–ठाणे–CSMT या अत्यंत गर्दीच्या मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. विशेषतः सकाळच्या पीक अवर्समध्ये या मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ऑफिसच्या वेळेत लोकल गाड्या जर काही मिनिटे जरी उशिराने धावल्या, तरी त्याचा परिणाम संपूर्ण वेळापत्रकावर होतो आणि पुढील काही तास प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आता मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण आणि गेमचेंजर ठरणारा निर्णय घेतला आहे.
उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा थेट परिणाम अनेकदा उपनगरीय लोकल सेवेवर होत असतो. एखादी एक्सप्रेस गाडी उपनगरातील स्थानकाजवळून जात असताना सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकल गाड्यांना सिग्नलवर थांबवावे लागते. यामुळे लोकल २० ते २५ मिनिटांपर्यंत उशिराने धावतात. याचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला बसतो. लोकल उशिराने आल्यामुळे डब्यांमध्ये असह्य गर्दी होते आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
पीक अवर्समध्ये एक्सप्रेस उपनगराबाहेरच थांबणार
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून पीक अवर्सदरम्यान लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना थेट मुंबई उपनगरात प्रवेश दिला जाणार नाही. या गाड्यांना टिटवाळा, आसनगावसारख्या स्थानकांपूर्वीच थांबवण्यात येणार आहे. टिटवाळा आणि आसनगाव येथून दररोज मोठ्या प्रमाणात लोकल गाड्या CSMT, दादर आणि कल्याणच्या दिशेने धावतात. मात्र याच मार्गावरून उत्तरेकडून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्या आल्याने लोकल सेवेचा खोळंबा होत होता. नव्या निर्णयामुळे लोकल सेवेला प्राधान्य देण्यात येणार असून वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध राहण्याची शक्यता आहे.
थंडी व धुक्यामुळे होणाऱ्या विलंबावर उपाय
सामान्यतः लांब पल्ल्याच्या गाड्या पहाटे ५ वाजण्यापूर्वी मुंबई उपनगरात दाखल होणे अपेक्षित असते. मात्र हिवाळ्यात उत्तर भारतात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे या गाड्या अनेकदा ४ ते ५ तास उशिराने धावतात. परिणामी त्या थेट सकाळच्या पीक अवर्समध्ये मुंबईत पोहोचतात आणि लोकल सेवेत मोठा अडथळा निर्माण होतो. आता नव्या नियमानुसार सकाळी ५ नंतर उपनगरात पोहोचणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना पीक अवर संपेपर्यंत मुंबईच्या वेशीवरच थांबवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना काहीसा विलंब सहन करावा लागणार असला तरी दररोज लाखो लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवासी संघटनांकडून स्वागत होत असून, यामुळे सकाळच्या वेळेत लोकल सेवा अधिक वेळेवर आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पीक अवर्समध्ये लोकलला फर्स्ट प्रायोरिटी
लोकल प्रवाशांना दिलासा! एक्सप्रेस गाड्या उपनगराबाहेरच थांबणार
कल्याण–ठाणे–CSMT मार्गावर शिस्त येणार, मध्य रेल्वेचा गेमचेंजर प्लॅन