नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आपली निराशा मांडली आहे. उद्या महाराष्ट्रातले आमचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, ओबीसीचे लोक आहेत, समता परिषदेचे लोक आहेत हे सगळे उद्या येणार आहेत. त्या सगळ्यांशी चर्चा करु. शांतपणे विचार करु. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे, निराशा आहे. आम्ही त्या सगळ्यांना एवढेच सांगितले आहे की, तुम्हाला जे काही व्यक्त करायचे आहे ते मोबाईलवरसुद्धा किंवा बाहेरसुद्धा असंस्कृतपणे कुणीही काही बोलू नये. तुमची मते जी आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
कोणी मंत्रिपद नाकारले शोधावे लागेल आणि कोणी नाकारले तरी शेवटी जे आहे त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे. ते निर्णय घेत असतात. मंत्रिपदाचा प्रश्न नाही, प्रश्न ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. त्यासंदर्भात मी उद्या तुम्हाला आणखी काही सांगेन. मला जे काही कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता. लोकसभेला मी जातो म्हणालो, ऐनवेळा तुम्ही नाव जाहीर नाही केलं, राज्यसभेची जागा आली मी म्हटले मला जाऊ द्या, नाही दिली. दुसरी जागा आली त्याठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधूंचे नाव द्यायला लागले मी म्हटले मला जाऊ द्या. माझा फायदा होईल पक्षाला. तेव्हा त्यांना शब्द दिलाय सांगितले. आता ते सांगतात तुम्ही राज्यसभेवर जा, का? तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचे आहे, त्यांनी ते केले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आता मी निवडणूक लढलो. अजून त्या मतदारसंघाचे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी माझ्या लोकांनी जीव काढला. मला निवडून आणण्यासाठी त्यांना मी काय सांगू. मी राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. ते म्हणाले आपण चर्चा करु बसू, तर कधी बसलेच नाही. मी सगळ्यांचा भूमिका ऐकून घेत आहेत. मी काही तुमच्या हातातले लहान खेळणं आहे का? तुम्हाला वाटेल तेव्हा, जा आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा. ते ही जाऊद्या, पण आता माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल. तुम्ही म्हणणार बस बस, ऊठ ऊठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. असे छगन भुजबळ म्हणाले.