भारताचे सरन्यायाधीश बी. आर गवई 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असून त्यांनी निरोप समारंभात बोलताना मी बौद्ध धर्माचे पालन करतो, परंतु मला कोणत्याही धार्मिक अभ्यासात फारसा रस नाही. मी खरोखर धर्मनिरपेक्ष आहे आणि हिंदू धर्म, शीख धर्म, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायलायाच्या अॅडव्होकोट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनने सरन्यायाधीश बी. आर. गवई (CJI B.R. Gavai) यांच्यासाठी (SCAORA) आयोजित केलेल्या निरोप समारंभात बोलत होते. 23 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश गवई निवृत्त होत आहेत आणि आज शुक्रवारी त्यांचा सर्वोच्च न्यायालयात शेवटचा कामकाजाचा दिवस आहे.
वडिलांकडून धर्मनिरपेक्षता शिकलो
या समारंभात बोलताना सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले की, मी माझ्या वडिलांकडून शिकलो कारण ते डॉ. आंबेडकरांवर विश्वास ठेवत होते. कोणीतरी त्यांना एका दर्ग्याबद्दल सांगितले… आम्ही तिथे जायचो. त्यांनी या भाषणात आंबेडकर यांचे महत्व सांगितले. पुढे बोलताना गवई म्हणाले की, मी आज जे काही आहे ते न्यायपालिकेमुळे आहे आणि मी नेहमीच त्याचा ऋणी राहीन. डॉ. आंबेडकर आणि संविधानामुळेच मी या पदावर पोहोचलो असं या निरोप समारंभात बोलाताना सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले.
पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले की, मला वाटत नाही की महानगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर शिक्षण घेतलेला कोणताही मुलगा असे स्वप्न पाहू शकेल. मी भारतीय संविधानाच्या चार तत्वांनुसार जगण्याचा प्रयत्न केला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. सरन्यायाधीश म्हणून गेल्या सहा महिन्यांत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून गेल्या साडेसहा वर्षात मी जे काही साध्य केले आहे ते या संस्थेमुळे आहे, ज्याने आम्हाला शक्य ते सर्व करण्यास सक्षम केले आहे असं देखील सरन्यायाधीश गवई म्हणाले.
मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीशांवर केंद्रित नसावे, तर सर्व न्यायाधीशांवर केंद्रित असले पाहिजे. निर्णय मी वैयक्तिकरित्या घेत नाही, तर पूर्ण न्यायालयासमोर आणि भाषणांमध्ये सादर केलेल्यांवर घेतो. सर्वोच्च न्यायालय ही एक उत्तम संस्था आहे आणि ती न्यायाधीश, बार असोसिएशन, रजिस्ट्री आणि कर्मचाऱ्यांसह सर्व भागधारकांच्या सहभागाने कार्य करते. बार असोसिएशनच्या समस्या सोडवताना SCBA आणि SCAORA चा नेहमीच विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.