मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरात आज इंद्रायणी नदीच्या काठावरील जुना पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे 20 ते 25 पर्यटक पाण्यामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे.
रविवार असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी सहलीसाठी आले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. त्याचसोबत 38 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर बचावकार्य सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकची माहिती दिली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की," मी या दुर्घटनेविषयी येथील तहशिलदारासोबत बोललो आहे. या दुर्घटनेत जे लोक जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याचसोबत जे अडकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. यामध्ये काही लोक वाचण्याची शक्यता आहे. आता यामध्ये कसं लक्ष देता येईल आणि कशाप्रकारे लोकांना धीर देता येईल याकडे लक्ष आहे".