अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये (Melghat, Amravati) पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिल्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घोषित केलं आहे. मेळघाटातील पाचडोंगरी व कोयलारी गावात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू झाला होता. तर 50 पेक्षा जास्त नागरिक उपचार घेत आहेत. याशिवाय हे दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्या लोकांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचं देखील त्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवणीत कौर यांना थेट फोन करून निर्देश दिले होते. त्यानंतर काही वेळात त्यांनी ही मदत जाहीर केली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी व कोयलारी या गावात दूषित पाण्यामुळे डायरीयाची लागण झालेली आहे. यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यासोबतच तब्बल तीस ते चाळीस नागरिकांना उपचारासाठी काटकुंभ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती काटकुंभ आरोग्य केंद्राचे डॉक्टर अंकित राठोड यांनी दिली होती. त्यामुळे आता नागरिकांची चिंता वाढली असून, स्थानिक प्रशासनाच्या कामावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.