राज्यातील पहिल्या टप्प्यातील 264 आणि दुसऱ्या टप्प्यातील 24 अशा एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. आज रविवारी (21 डिसेंबर) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. तब्बल 18 दिवसांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाची मतमोजणी होत असल्याने निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 24 नगरपालिका, नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि सदस्यपदाच्या निवडणुका न्यायालयीन अपील दाखल असलेल्या पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. या 24 ठिकाणच्या निवडणुका शनिवारी पार पडल्या. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी आज रविवारी एकाचवेळी हाती घेण्यात येणार आहे. काही बिनविरोध नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये उमेदवार निवडून आले आहेत. उमेदवारांप्रमाणे काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध निवडून गेले आहेत. दोन्ही टप्प्यातील जवळपास साडेसहा हजाराहून अधिक जागांसाठी त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या जागा वगळता रविवारी मतमोजणी होईल. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक तेथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सत्ताधारी पक्षात चुरस
कोरोना संकट, इतर मागासवर्ग आरक्षण, प्रभाग रचना यामुळे अनेक वर्ष रखडलेल्या नगरपालिका, नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अखेर पार पडल्या आहेत. या निवडणुका सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पूर्ण ताकदीनिशी लढवल्या. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अनेक महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे येथील लढतींविषयी उत्सुकता आहे. भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेतल्या. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची आघाडी सांभाळली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीसह अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या वतीने प्रचारात भाग घेतला. विक्रमी मतदान पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये झाले आहे. त्यामुळे येथील निकालाची राजकीय निरीक्षकांना उत्सुकता आहे. या निवडणुकीसाठी भाजपने लावलेली ताकद पाहता हा पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.