रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असून अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूर येथे माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, आम्ही ज्यावेळी उद्योग महाराष्ट्रात आणतो त्यावेळी अडथळा निर्माण केला जातो. इथून फोन करायचे आणि वातावरण बिघडवायचं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. असे केसरकर म्हणाले.
यासोबतच ते म्हणाले की, भर उन्हात राजकारणासाठी त्यांना बसवायचं ही भूमिका चुकीची आहे. त्यांनी चर्चेला यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू. केवळ पोलिसांची बदनामी व्हावी म्हणून ज्या महाराष्ट्रात महिलांचा सर्वाधिक सन्मान केला जातो. तिथे महिलांना समोर करायचं, जमिनीवर लोळायला लावायचं. बारसूत स्कार्फ घालून काही लोक घुसले होते. ते कोण आहेत? याचा तपास केला पाहिजे. असे केसरकर म्हणाले.