नागपूरच्या राजभवनावर महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 1991नंतर 33 वर्षांनंतर नागपूरला शपथविधीचा मान मिळाला. भाजपचे 19, शिवसेनेचे 11 तसंच राष्ट्रवादीकडून 9 मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आलं आहे. छगन भुजबळांपासून ते अब्दुल सत्तारांपर्यंत अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आले आहे. राज्यातले ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते, आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाचा पत्ता कटा झाला आहे. तसेच, भाजपचे नेते आणि माजी मंत्री डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपदाची संधी हुकली आहे.
शिवसेनेतून माजी मंत्री, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना देखील संधी मिळाली नाही. तसेच माजी मंत्री दीपक केसरकर यांचीही संधी हुकली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. शिवसेनेच्या तानाजी सावंतांना डच्चू दिला गेला. तर भाजपच्या राणा जगजितसिंह पाटलांच्याही पदरी निराशा पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा अत्राम यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.
"एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं"
आम्ही वेगवेगळ्या समाजांना, जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व दिलं आहे. अनेक माजी मंत्री या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. यामागे वेगवेगळी कारण आहेत.
मी माझ्या पक्षापुरतं उत्तर देईन. अनेकदा काही मंत्र्यांना पक्षांतर्गत कारणांमुळे मंत्रिमंडळात घेतलं जात नाही. उदाहरणार्थ पक्षाने एखाद्या नेत्याला वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल तर त्या नेत्याला आम्ही मंत्रिमंडळात घेत नाही. भाजपात कोणाला पक्षात मोठी जबाबदारी द्यायची असेल तर आम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत नाही.
तसेच असेही असू शकतं की एखाद्या नेत्याला त्याच्या कामगिरीमुळे मंत्रिमंडळात स्थान देणं टाळलेलं असू शकतं.
संपूर्ण पत्रकार परिषद पाहण्यासाठी क्लिक करा-