महाशिवरात्री हा केवळ एक धार्मिक सण नसून भक्ती, ध्यान आणि आत्मशुद्धीची पवित्र रात्र मानली जाते. या दिवशी भगवान शिवाची विशेष आराधना केली जाते. अनेक भक्त उपवास करतात, रात्रभर ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करतात आणि शिवमंदिरात जाऊन अभिषेक व दर्शन घेतात. धार्मिक श्रद्धेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी दिसणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्याचा सकारात्मक परिणाम जीवनावर होतो.
महाशिवरात्र कधी आहे
पंचांगानुसार, महाशिवरात्रीची सुरुवात 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.4 वाजता सुरू होणार आहे आणि 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.34 पर्यंत असणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी चतुर्दशी तिथी असल्याने महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव रविवार, 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे.
बेलपत्र भगवान शिवांना अतिशय प्रिय मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सहज बेलपत्र मिळणे किंवा बेलाचे झाड दिसणे शुभ संकेत मानला जातो. धार्मिक ग्रंथांनुसार बेलाची तीन पाने त्रिमूर्तीचे प्रतीक आहेत – ब्रह्मा, विष्णू आणि महेश. श्रद्धेने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी समजूत आहे.
रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवांच्या अश्रूंमधून झाली, अशी धार्मिक कथा सांगितली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्षाची माळ मिळणे किंवा ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रद्धेने रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो, असे मानले जाते. अनेक भक्त या दिवशी नवीन रुद्राक्ष परिधान करतात.
भगवान शिवांचे वाहन नंदीचे दर्शन महाशिवरात्रीला विशेष फलदायी मानले जाते. नंदीसमोर दिवा लावताना मनात शांतीची अनुभूती मिळाली, तर ती प्रार्थना स्वीकारल्याचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे नीलकंठ (ब्लू थ्रोट) पक्षी दिसणेही शुभ संकेत मानला जातो. लोकप्रिय समजुतीनुसार, नीलकंठ दर्शनामुळे सन्मान, यश आणि आर्थिक समृद्धी प्राप्त होते.