मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या बहुचर्चित दौऱ्यामधून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होणार असून कालपासून अनेकांच्या गाठीभेटी घेत मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली आहे. अशातच आता दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीसाठीचा पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे.
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी पहिला करार गडचिरोलीसाठी करण्यात आलाय. कल्याणी समुहाकडून गडचिरोलीत पोलाद उद्योगात ५ हजार २०० कोटींची गुंतवणूक केली जामार आहे. यासाठी कल्याणी उद्योग समुहाने राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केलाय.
स्टील आणि संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये करार झाला. यात पोलाद उद्योगासाठी ५ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. गडचिरोलीत यामुळे ४ हजार रोजगार निर्मिती होईल. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीनंतर हा करार झाल्याची माहिती समोर येत आहे.
दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.