हैद्राबाद येथे भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आनंद साजरा करताना अवघा परिसर शोकसागरात बुडाला. रविवारी रात्री उशिरा हैदराबादमधील रामंतपूरम येथील गोकुळनगर भागात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मिरवणुकीदरम्यान रथ वीजेच्या तारेच्या संपर्कात आला आणि क्षणभरात भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
जन्माष्टमी उत्सवानिमित्त रथयात्रा निघाली होती. रथाला सुरुवातीला वाहनाने ओढण्यात येत होतं. मात्र, नंतर काही तरुणांनी स्वतः रथ ओढण्यास सुरुवात केली. त्याच वेळी रथाचा वरचा भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. क्षणात प्रवाह संपूर्ण रथातून पसरला आणि रथ ओढत असलेल्या नऊ तरुणांना जबरदस्त धक्का बसला.
काही सेकंदांतच आनंदमय वातावरणात भीषण किंकाळ्यांचे आणि आक्रोशाचे स्वर गुंजू लागले. या दुर्घटनेत कृष्णा यादव (21), सुरेश यादव (34), श्रीकांत रेड्डी (35), रुद्रविकास (39) आणि राजेंद्र रेड्डी (45) या पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्यांमध्ये केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचे गनमॅन श्रीनिवास यांचादेखील समावेश आहे.
वीजेचा धक्का बसल्याने तरुण जमिनीवर कोसळले. स्थानिक नागरिकांनी धावत सुटून मदतकार्य सुरू केलं. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी पाच जणांना तपासून मृत घोषित केलं. इतर चार जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या घटनेमुळे गोकुळनगर परिसरात शोककळा पसरली आहे. उत्सवाचे वातावरण एका क्षणात अंत्यसंस्काराच्या वातावरणात बदललं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, दुर्घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.