भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार असलेला सौरव गांगुली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आपली तयारी असल्याचं त्याने नुकत्याच पिटीआय दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. "पूर्वी वेळ मिळाला नाही, पण आता मी तयार आहे," असं म्हणत त्याने क्रिकेट क्षेत्रात पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राजकारणात जाण्याच्या शक्यतेलाही त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.
“गंभीरने चांगली सुरुवात केली आहे”
गेल्या वर्षी प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतलेल्या गौतम गंभीरच्या कामगिरीचं गांगुलीने कौतुक केलं. "त्याची सुरुवात जरा संथ होती, पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंड दौरा निर्णायक ठरेल," असं म्हणत गांगुलीने गंभीरच्या नेतृत्वात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली. गांगुली म्हणतो, "मी बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होतो, नंतर बीसीसीआयचं नेतृत्व केलं. त्यामुळे प्रशिक्षक होण्यासाठी वेळ नव्हता. आता मात्र मी पन्नाशी ओलांडली आहे आणि पुन्हा कामासाठी सज्ज आहे. जर संधी मिळाली, तर मी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार आहे."
गांगुलीने 1992 साली वनडेमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि 1996 मध्ये लॉर्ड्सवर कसोटी डेब्यू करत १३१ धावांची शानदार खेळी केली. त्याने 113 कसोटी सामन्यांत 7,212 आणि 311 वनडेमध्ये 11,363 धावा केल्या आहेत. 2000 मध्ये भारतीय संघाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्याच्या नेतृत्वात भारताने अनेक ऐतिहासिक सामने जिंकले.
2003 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने अंतिम फेरी गाठली, तर 2002 मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली. 2015 ते 2019 दरम्यान बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष, तर 2019 ते 2022 पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा गांगुलीने सांभाळली. त्यानंतर तो ICC पुरुष क्रिकेट समितीचा अध्यक्ष झाला. याशिवाय, 2017 मध्ये प्रशिक्षक निवडणाऱ्या समितीचा सदस्यही तो होता, ज्यामध्ये रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. गौतम गंभीरने गेल्या वर्षी राहुल द्रविडनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारली असून त्याचा कार्यकाळ 2027 पर्यंत निश्चित आहे.