Virar Building Collapse : विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक गंभीर अपघात घडला. स्वामी समर्थ नगरमधील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील चौथ्या मजल्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर एक जखनी असून दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे.
एनडीआरएफच्या 5 व्या बटालियनच्या 2 पथकांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफच्या अहवालानुसार आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर १ ज़ख़मी असून दोघाना सुरक्षित बाहेर काढलं आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत 7 जणांना सुरक्षित बाहेर काढले होते.सध्या ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी इमारतीत जोयल कुटुंबातील एका लहान मुलीचा वाढदिवस सुरू होता. दुर्दैवाने त्या चिमुरडीचा आणि तिच्या आईचा यात मृत्यू झाला आहे, तर वडील बेपत्ता आहेत. तसेच चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर, त्यांची पत्नी सुपरीला आणि मुलगा अर्णव यांच्याशीही अद्याप संपर्क साधता आलेला नाही.
स्थानिक रहिवाशांच्या मते, अपार्टमेंटची स्थिती अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती. महापालिकेने यापूर्वी इमारतीबाबत ऑडिट करण्याची नोटीस दिली होती. परिसर दाट वस्तीचा असल्यामुळे जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत. सध्या इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली असून, मलबा हटवून अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.