कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. गुलालाची उधळण करुन बाप्पाची मिरवणूक निघाली आहे. जल्लोषाचे वातावरण, फटाक्यांती आतषबाजी होत आहे.
आज शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. मुंबईचा राजा मिरवणुकीला सुरुवात, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी देखिल सुरू झाली आहे. बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २० हजार पोलिसांना विसर्जन स्थळ व मार्गिकांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळासह मध्य मुंबईतील दादर, लालबाग व परळ परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत.