चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये आज सायंकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे. तत्पूर्वी, केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीरने एम एस धोनीबाबत मोठं विधान केलं आहे. धोनी जेव्हा कर्णधार होता, तेव्हा त्याच्या रणनीतीमुळे सामन्यात विजय मिळायचा. मी जेव्हा केकेआरचा कर्णधार होतो, त्यावेळी चेन्नईविरोधात कोलकाताला सामना जिंकवून देण्याचाच मी विचार करायचो. माझी भूमिका खूप स्पष्ट आहे. आपापसातील सन्मान एका जागेवर असतं. पण तुम्ही मैदानात जेव्हा एकमेकांविरोधात खेळता, तेव्हा तुम्ही जिंकायचाच विचार करता.
माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर पुढे म्हणाला, एम एस धोनी भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कुणीही त्या स्तरावर पोहचू शकतं, असं मला वाटत नाही. आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकवून देणं, हे सोपं काम नाहीय. धोनीविरोधात आयपीएलमध्ये खेळलो, तेव्हा या प्रतिस्पर्धीचा मी खूप आनंद घेतला. धोनी रणनीतीबाबत खूप चांगला आहे.
फिरकीपटूंचा वापर कसा करायचा आहे, हे त्याला माहित असतं. तसंच मैदानात क्षेत्ररक्षण लावण्यातही तो माहीर आहे. तो कधीच हार मानत नाही. धोनी ६ किंवा ७ नंबरवर फलंदाजी करायचा. जोपर्यंत धोनी खेळपट्टीवर राहील, तो सामना फिनीश करून येईल, असा विश्वास त्याच्यावर होता. एका षटकात २० धावांची गरज असेल आणि धोनी खेळपट्टीवर असेल, तर तो सामना जिंकवू शकतो.