पश्चिम रेल्वेवरील लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, १ फेब्रुवारीपासून चार अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. वाढती प्रवासी संख्या, गर्दीचा वाढता ताण आणि प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल फेऱ्यांची एकूण संख्या १४०६ वरून १४१० इतकी होणार आहे.
पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या चार नॉन-एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन केले असून, या सर्व फेऱ्या धिम्या मार्गावर धावणार आहेत. यामुळे विशेषतः कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढली असून, अनेक लोकलमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा अधिक सुरळीत करण्यासाठी कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यामुळे अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवणे शक्य झाले आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी ही माहिती दिली. सहावी मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली झाल्यामुळे बोरिवली आणि वांद्रे टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा होऊन ऑपरेशनल कार्यक्षमता वाढली आहे.
नव्या लोकल फेऱ्यांमध्ये अप आणि डाऊन दिशेने प्रत्येकी दोन फेऱ्यांचा समावेश आहे. अप मार्गावर सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांनी भाईंदर येथून वांद्रेला जाणारी लोकल सुटणार आहे. तसेच दुपारी १२ वाजून १४ मिनिटांनी भाईंदर ते चर्चगेट अशी दुसरी लोकल धावणार आहे. डाऊन मार्गावर वांद्रे येथून पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी आणि दुपारी १ वाजून २१ मिनिटांनी वांद्रे ते भाईंदर लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या अतिरिक्त लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने भविष्यातही प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी सुधारणा करण्याचे संकेत दिले आहेत.